रयतेची शतकोत्तर वाटचाल...!
शिवछत्रपतींनी दीनदुबळ्या लोकांसाठी 'रयत' हा शब्द योजला, त्याच शब्दाचा पुनरुच्चार करीत कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली, तिला आज १०१ वर्षे पूर्ण होत आहेत.देशात कोणतेही शैक्षणिक धोरण नसताना स्वातंत्र्यापुर्वी रयतची स्थापना झाली होती,तदनंतर पन्नास वर्षानी महाराष्ट्र राज्याची निर्मीती झाली. त्यामुळे देश व राज्य सुसंस्कृत व साक्षर करण्यात रयतचे योगदान असून महाराष्ट्रातील जनता ते कधीच विसरू शकणार नाही..
लॉर्ड मेकॉलेच्या सिद्धांतानुसार, महाराष्ट्रात शिक्षण संस्था शहरात सुरू होत असतानाच कर्मवीरांनी 'काले' या ग्रामीण भागात शिक्षण आरंभ करून देशात ग्रामीण क्रांतीची ज्योत पेटवली.
७३७ शाखा, पंधरा हजार सेवक व साडेचार लाख विद्यार्थी सध्या रयत मध्ये असून गेल्या शंभर वर्षांपासून हा 'ज्ञानयज्ञ' अव्याहतपणे सुरू आहे. सध्या रयत प्रवाहात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष एक कोटीहून अधिक लोक असून न्युझीलंड,ऑस्ट्रिया,स्वीडन या देशांची लोकसंख्या देखील एक कोटीहून कमी आहे,म्हणून रयत ही आशिया खंडात प्रथम क्रमांकाची संस्था मानली जाते.
सध्या रयतचे वार्षिक बजेट दहा अब्ज पन्नास कोटी रुपये एवढे असून ते मागील काही दिवसांपूर्वी गोवा राज्याच्या बजेटच्या जवळपास होते!
महाराष्ट्रात रयतने पहिली कृषी शाळा धनिणीच्या बागेत सुरु केलीच, पण आजही १६७२ एकर रयतचे शेतीक्षेत्र आहे, देशातील पहिले महिला डीएड कॉलेज काढून महाराष्ट्रातील मुलींना शिक्षिका करण्याचे महान कार्य रयतनेच केले.देशाच्या स्वातंत्र्यात,गोवा मुक्तिसंग्रामात रयतने मोलाचे योगदान दिले आहे.कर्मवीरांची इच्छा होती की,'रयत विद्यापीठ'व्हावे तिची पूर्तता पूर्ण होत आहे याचा आम्हा सर्वांना अत्यानंद होतोय!!
आधुनिक शिक्षण देण्याकरिता रयत शिक्षण संस्थेने सहकार्य करार देखील केलेले आहेत.टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड,लुपिन लिमिटेड, टाटा बिझनेस सपोर्ट सर्विसेस,द लीडर्स इन इंडस्ट्री, एस एन एस फाउंडेशन, राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन, होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स, जैन इरिगेशन सिस्टीम, फाली यांसारख्या संस्थांशी रयत शिक्षण संस्थेने सहकार्य करार केलेले आहेत.
ग्रामीण विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख आधुनिक शिक्षण तसेच नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देण्यासाठी रयत शिक्षण संस्था प्रयत्न करीत आहे. कर्मवीर अण्णा नेहमी म्हणत, "जोपर्यंत समाजाला गरज आहे तोपर्यंत माझी रयत समाजाच्या उत्कर्षासाठी काम करेल" ही त्यांची घोषणा खऱ्या अर्थाने त्यांच्या पश्चातही सार्थ ठरत आहे
(संदर्भ - युगप्रवर्तक कर्मवीर पुस्तकातून...)